url shortner

Thursday, November 28, 2019

रायगडाच्या विकासासाठी २० कोटी; मुख्यमंत्र्यांची घोषणा

मुंबई: महाराष्ट्र विकास आघाडीच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर तातडीने मंत्रिमंडळाची बैठक घेणारे नवनिर्वाचित मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पहिला निर्णय घेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगड किल्ल्याच्या विकासासाठी २० कोटी रुपये वितरित करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घोषित केला आहे. रायगड किल्ल्याच्या विकासासाठी २० कोटी रुपये मंजूर करण्याच्या निर्णयाला मंत्रिमंडळाने मंजुरी दिल्याचे सांगत हा निर्णय घोषित करताना आपल्याला अतिशय आनंद होत असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली. मुख्यमंत्री ठाकरे मंत्रिमंडळ बैठकीनंतरच्या पत्रकार परिषदेत बोलत होते. राज्याच्या जनतेला महाराष्ट्र विकास आघाडीच्या माध्यमातून चांगले सरकार देण्याचा आमचा प्रयत्न असून तीन पक्षांच्या हे सरकार राज्यातील सामान्य माणसासाठी काम करेल असे ठाकरे म्हणाले. राज्यात निर्माण झालेले भीतीचे वातावरण दूर करण्याचे काम आपले सरकार करेल असेही ठाकरे म्हणाले. 'शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत करणार' राज्यातील शेतकऱ्यांना आपले सरकार सर्वतोपरी मदत करेल असे अभिवचन ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत दिले. राज्यातील प्रत्येक शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर समाधान झळकेल असे काम आपले सरकार करणार असून आता पर्यंत शेतकऱ्यांना केवळ आश्वासने मिळाली आहेत, अशी अप्रत्यक्ष टीका त्यांनी मागील फडणवीस सरकारवर केली. आमचे सरकार शेतकऱ्यांना ठोस मदत देणार आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले. राज्यातील शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारच्या आणि केंद्र सरकारच्या आतापर्यंतच्या योजना काय आहेत याची माहिती दोन दिवसांत द्यावी अशा सूचना आपण अधिकाऱ्यांना केली असून, मला सर्व तपशील कळल्यानंतर शेतकऱ्यांबाबत ठोस निर्णय घेणार, असे ठाकरे म्हणाले. 'संविधानात लिहिली आहे तीच ' महाराष्ट्र विकास आघाडीत सहभागी होत शिवसेनेने धर्मनिरपेक्षता स्वीकारली आहे का, असा प्रश्न विचारला असता मुख्यमंत्री म्हणाले की, धर्मनिरपेक्षतेचा अर्थ काय आहे?... संविधानात जो लिहिला आहे तोच धर्मनिरपेक्षतेचा अर्थ आहे. माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र विकास आघाडीच्या किमान समान कार्यक्रमावर टीकास्त्र सोडले आहे. यालाही मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिले आहे. हे मंत्रिमंडळ संपूर्ण महाराष्ट्रासाठी काम करणार असून त्यांना (देवेंद्र फडणवीस) ते कळत नसेल तर त्यांनी त्याचा अभ्यास करावा, असा टोला ठाकरेंनी लगावला. महाराष्ट्र विकास आघाडीच्या किमान समान कार्यक्रमात मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्राची दखल घेण्यात आलेली नाही, अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली होती.


from Mumbai News, Latest Mumbai News in Marathi, Mumbai Local News, Mumbai News Online, मुंबई बातम्या https://ift.tt/35Gd3Nk

No comments:

Post a Comment